Tweet

Sunday 6 May 2012

वाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन


Dangerous Road Crossing
भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे समजले जाते की, वाहतुकीचे नियम बनविले व ते मोडणारांना शिक्षा केली तर शिक्षेच्या भीतीने जनता नियम पाळेल. परंतु, हा एक गैरसमज आहे. सर्वसाधारणपणे असे दिसते की, लोकांची वृत्ती नियम पाळण्याची नसते. त्यांना वटते की, वर्ष-सहा महिन्यात एखाद्या वेळेला पकडले जाण्याची शक्यता असते. जर पकडले गेलो तर पोलिसाला 50 रुपयांची एक नोट दिली की, प्रकरण मिटते. अशा परिस्थितीत नियम कितीही कडक असले तरी त्यांचा परिणाम शून्य असतो. धर्मसंस्थापकानी यावर उत्तम उपाय शोधले व देव या संकल्पनेची निर्मिती केली.
देवाबद्दल आदरयुक्त भिती समाजातील सर्व व्यक्तिमध्ये निर्माण केली. वाहतुकीच्या समस्येकरिता असेच काही करण्याची आवश्यकता आहे. निदान नियम तोडले जाऊ नयेत अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. माझे विचार पुढे दिले आहेत. पटले तर व्यवहारात आणाल अशी आशा आहे.
Pedestrian Causes Bus Accident
वाहतुक समस्येचे मूळ शहराच्या अनिर्बंध वाढीत आहे. आधी वसाहत व नंतर सुविधा अशा प्रकारच्या घोड्यापुढे गाडी जोडून घोड्याला गाडी ओढ म्हणण्यासारखे आहे. पूर्वीच्या काळी पाणी हा वसाहतीकरिता मुख्य मुद्दा होता. आधी पाण्याचा स्त्रोत पाहून वसाहत केली जात असे. सध्या वाहतुक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वाहतुकीची व्यवस्था प्रथम व वसाहत नंतर असे समीकरण व्यवहारात आणले पाहिजे. पुण्यामध्ये बाह्यवळणमार्ग बांधल्यावर तेथे वसाहत झाली व वहातुकीच्या समस्या निर्माण झाल्या नाहीत हे लक्षात घ्यावे. शहराची वाढ थांबविणे हा कष्टाचा परंतु, जालिम उपाय आहे. हे आपल्या अधिकारात नाही परंतु, आपण योग्य ठिकाणी हा विचार पोहचवू शकता.
Sketch of Flats constructed as old concept of ground Fort
गुन्हे झाल्यावर शोधण्यापेक्षा गुन्हे होऊच नयेत या करिता काही केले तर ते जास्त प्रभावी होईल. आपण वाडा-चाळ संस्कृतीच्या गोड आठवणी काढतो परंतु, शहरामध्ये घर म्हणजे सदनिका हे समीकरण दिसते. या सदनिका पाश्च्यात्य पद्धतीने बांधल्या जातात. या जुन्या पद्धतीने बांधण्याकरिता चटईक्षेत्र निर्देशांकाचा अडथळा येतो. जर चौरसाच्या परिघावर सदनिका बांधल्या व त्यांना आतील बाजूने 2 मिटर रुंद बाल्कनी दिली तर वाड्यासारख्या सदनिका बांधता येतील. जर या बाल्कनीचा चटईक्षेत्र निर्देशांकात समावेश केला नाही तर तशा सदनिका विकसक बांधतील. त्यामुळे प्रत्येक घर इतरांच्या नजरेखाली राहिल व घरफोड्या, वृद्धाचे खून या प्रकारच्या गुन्ह्यावर प्रतिबंध येतील.
सर्वसाधरणपणे शासन नियम बनविते व पोलिसयंत्रणा ते पाळले जावेत म्हणून प्रयत्न करते. म्हणजे जनतेने ते पाळावेत म्हणून प्रयत्न करते. परंतु, सध्या असे नियम बनविले जातात की, ते पुस्तकात उत्तम वाटतात व पाळले गेले तर सर्व जनतेच्या ते फायद्याचेच होईल असे प्रथमदर्शनी दिसते. प्रत्यक्षात मात्र हे नियम पाळणे अवघड असते व पोलिसयंत्रणा ते पाळावयास शिकवण्याऐवजी मोडल्यावर दंड आकारण्यस सरसावते. कित्येक उदाहरणे देता येतील. हेल्मेट, पदपथ ही दोन उदाहरणे घेऊ. हेल्मेट वापरणे दुचाकीस्वारांना पुष्कळ वेळा लाभदायक ठरते. परंतु, हेल्मेट ठेवण्याकरिता कसलीही सोय दुचाकी उत्पादक करत नाहीत. अशी सोय जर दुचाक्यांवर केली तर जवळ जवळ सर्वच हेल्मेट वापरतील. हेल्मेट सक्ती करण्याअगोदर हेल्मेट सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवण्याची सोय करण्याचे बंधन उत्पादकावर घातले पाहिजे. पादपथाचा उपयोग पादचाऱ्यांनी केल्यास वाहनांशी त्यांचा अपघात होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य होईल.
Misuse of Side Walk
 परंतु, पादपथ हे पादचाऱ्यांपेक्षा इतराना वापरण्या करिता बनविले जातात. रस्त्यापेक्षा 30-40 सेंमी उंच असतात, वाहने आत नेण्याकरिता वाकविले जातात, त्यावर काम्पाउंडचे गेट उघडले जाते, पदपथविक्रेते बसतात,वाहने उभी करतात. हेच पादचारीपथांचे मुख्य उद्देश दिसतात. सर्व पादचारीपथ समतल केले व त्यावरील अडथळे हटविले तर पादचारी त्यांचा उपयोग करतील व अपघातांची शक्यता जवळ जवळ शून्य होईल.
Car on Footpath
Careless Two Wheeler Drivers
शेवटचा मुद्दा. पोलिसांचा मानस जनतेला गोडीगुलाबीने शिकविण्यापेक्षा दंड करण्यावर असतो. त्यातही तडजोड करण्यावर भर दिला जातो. जनता विचार करते की, जर वर्ष-सहा महिन्यात 50 रुपयावर भागत असेल तर नियम का पाळा? ही मानसिकता बदलली पाहिजे. शासनाच्या इतर खात्याशी संवाद साधून नियम बनविले पाहिजेत की जे पाळता येतील. त्याच बरोबर अशी स्थिती निर्माण केली पाहिजे की नियम पाळले जातील. उदाहरणार्थ लेन शिस्त. सर्वसाधारणपणे असे नजरेस येते की ज्यां वाहनांना उजवीकडेवळावयाचे असेल ती वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूला असतात. कोणाचीही पर्वा न करता तीउजवीकडे वळतात व अपघात होतात. जर काँक्रिटचे लेन दुभाजक बसविले व चुकीच्या लेनमध्येवाहन आले तर ते वाहन उजवीकडे वळूच शकणार नाही अशी सोय केली तर नियम पाळणे अनिवार्यहोईल.
Accident at Crossing
Careless Two Wheeler Drivers


2 comments:

माधव बामणे said...

या लेखातील सर्वच सूचना व्यवहारात वापरता येण्यालारख्या आहेत. वाहतुक समस्येचे मूळ कारण शहरांच्या अनिर्बधित वाढीत आहे. सुरक्षा पाश्चात्य पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या सदनुकामुळे धोक्यात येते. हे दोन मुद्दे तरी विचाराच घेतलेच पाहिजेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यावरील सुविधा योग्य प्रकारे वापरल्या जाव्या म्हणून त्या सुविधा अशा निर्माण कराव्या की, ज्या करिता त्या बनविल्या आहेत त्याच कामाकरिता वापरल्या जाव्या. इतर प्रकारे वापरताच येऊ नयेत. शासनाने येवढे जरी केले तरी नागरिकांना समाधान मिळेल. नागरिकांनी स्वस्थ न बसता त्याचा पाठपुरावा करावा.

माधव बामणे said...

टीडीआर वापरासाठी रस्तारुंदी ७।। मिटर करण्याचा प्रस्ताव !
शासनाकडे पैसा नसल्यामुळे टीडीआरचा उपयोग पैशासारखा करता येतो. सार्वजनिक कामाकरिता जागेच्या बदल्यात पैसे न देता इतर ठिकाणी जादा बांधकाम परवानगी दिली जाते. थोडक्यात जेवढे बांधकाम करण्याचा हक्क दिला जातो त्यकरिता लागणाऱ्या जागेची किंमत शून्य केली जाते. आता पर्यंत या सवलतीचा वापर ६ मिटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतीमध्ये करता येत होता. परंतु, अरुंद रस्त्यावर लोकसंख्या व वाहनसंख्या वाढल्यामुळे रस्ता अपुरा पडतो. त्याकरिता ही सवलत जर रस्ता ९ मिटर रुंद असेल तरच वापरता येईल असा बदल करण्याचा विचार चालू होता. परंतु, त्यामुळे कमी रुंद रस्ता असलेल्या जुन्या सोसायटीकरिता हा बदल त्रासदायक ठरत होता. तेंव्हा एका जबाबदार राजकारण्यानी ती रुंदी ७।। मिटर करावी अशी दुरुस्ती सुचविली. या वेळी एका अभियंत्याने दिलेल्या उत्तराची आठवण आली. त्याला सिंमेंटचे काम काही दिवसात करण्याचा आदेश दिला. त्याचे उत्तर होते “मी तुमचा ताबेदार आहे तेंव्हा ते काम मी दिलेल्या दिवसात करीन. परंतु, सिमेंट आपले ताबेदार नसल्याने ते बांधकाम टिकेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही.” या मध्येही मनपाचे अधिकारी-कर्मचारी रस्त्याच्या रुंदीला कमी करतील. परंतु, रहदारीवर नियंत्रण त्यांना जमणे शक्य नाही. रस्त्याची रुंदी ठरवताना इतर कोठलेही निकष लावण्यापेक्षा रहदारीचे (तेही वाढत्या) निकष लावणेच योग्य ठरेल.

Popular Posts