Tweet

Tuesday 15 March 2011

ज्ञानाकरिता अभ्यास का व कसा करावा?

ज्ञानाकरिता अभ्यास म्हणजे व्यवहारांत जन्मभर पुरणारी शिदोरी. फक्त गुणवत्ता यादीत येण्याकरिता अभ्यास करणे हे ध्येय चांगले परंतु, उत्तम नव्हे.
परिक्षेत उत्तम गुण किंवा चांगले गुण किंवा फक्त उत्तीर्ण होणे एवढेच ध्येय बाळगणे ही पुढील आयुष्याकरिता  धोक्याची घंटा समजावी. व्यवहारांत पाठांतर करुन लिहलेली उत्तरे कामी येत नाहीत.
हे समजुन घेण्याकरिता फार लांब जाण्यची जरुरी नाही. 12 वीच्या परिक्षेतील गुणवत्ता यादी व व्यवसाय अभिमुख परिक्षेतील गुणवत्ता यादी तपासुन पहावी. 12 वीच्या परिक्षेत गुणवत्ता यादीत चमकणारे कित्येक विद्यार्थी- विद्यार्थिनीं  व्यवसाय अभिमुख परिक्षेतील गुणवत्ता यादीत बरेच खाली असू शकतात. व्यवहारात अशा किती तरी व्यक्ती भेटतील की च्या 12 वीच्या परिक्षेत चमकल्या नाहीत परंतु उच्च स्धानावर ताऱ्यांच्या आधी पोहचल्या. या व्यक्तींनी पोपटपंची ऐवजी ज्ञान कमावले. पाठ्यपुस्तकाशी प्रमाणित उत्तरे त्यांना लिहता आली नाहीत परंतु विषय त्यांना पूर्णपणे समजला. परिक्षेतील गुणांनी त्यांना निराशा केले पण व्यवसांतील गुणानी त्यांना तारले. परंतु याचा अर्थ असा नाही की, परिक्षेकरिता अभ्यास करूच नये. परिक्षेत उत्तम गुण मिळालेच पाहिजे नाहीतर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळणार नाही. ज्ञान मिळवण्याचा आधी प्रयत्न करा व नंतर परिक्षेकरिता अभ्यास करा. असा अभ्यास केल्याने दुप्पट वेळ लागणार नाही. 10-20 टक्के जास्त मेहनत करावी लागेल.
आपण सर्व पाहतो, ऐकतो, वाचतो, स्पर्श करतो व त्यातुन ज्ञान साठवत जातो. असे आहे तर 'ज्ञाना करता' आणखी वेगळे काय करायची गरज आहे? हे लक्षात येण्या करता संगणक व मानव यांची पद्धत तपासुन पाहु. संगणक मानवा पेक्षा किती तरी पट जास्त माहिती स्मरणात ठेऊ शकतो. परंतु त्या माहितीचा उपयोग निरनिराळ्या परीस्थितीत कसा करावा हे संगणका करता मर्यादित आहे. संगणकाच्या आज्ञावलीत जेवढे असेल तेवढ्याच ज्ञानाचा उपयोग संगणक करु शकतो. समजा आपण कार्यालयात जाताना कांही कामे सागितली व त्या करता 'मी कार्यालयात चाललो' हे वाक्य संगणकावर लिहले तर तो सांगितलेली सर्व कामे सफाईदार पणे करेल. आपल्याला तक्रारीला जागा ठेवणार नाही. परंतु, हेे वाक्य थोडे जरी बदलले जसे 'मी कार्यालयात जातो' तर संगणक मख्खा सारखा चेहरा करून बसेल. त्या जागी मनुुष्य असेल तर आपण कसेही लिहले तरी तो सर्व कामे करील (त्याची काम करण्याची तयारी असेल तर!). ंसंगणकाची स्मरणशक्ती दांडगी परंतु माहितीचा उपयोग करण्याची क्षमता कमी. ज्ञान हे आपण माहितीचा उपयोग किती क्षमतेने करतो या वर अवलंबुन आहे.
एक दुसरे उदाहरण घेऊ. सर्वच लहान मुले चालायला शिकताना प्रथम आई-बाबाचे हात धरतात. कालांतराने स्वतंत्र पणे चालतात. एक मुलगा शिकताना आई-बाबाचे बोलणे लक्षपुर्वक ऐकतो, स्पर्शातून जाणुन घेतो, इतर कसे चालतात ते पाहुन ध्यानात घेतो व हे सर्व मनात साठवुन त्याची उजळणी करतो. तद्नंतर आपली चालण्याची ढब ठरवन त्या प्रमाणेे स्वतंत्रपणे चालतो. दुसरा मुलगा कांहीही न अनुभवता आई-बाबाचे हात धरुन चालतच राहतो. आई-बाबाचे हात धरुन दुसरा मुलगा पहिल्या पेक्षा जास्त वेगाने चालेलही. परंतु, स्वतंत्रपणे चालण्याचा प्रसंग आल्यावर पहिला मुलगाच जास्त वेगवान ठरतो. शिक्षक व परिक्षेकरता तयार वाटाडे ('गाईड' प्रकारची पुस्तक) हे विद्यार्थ्यांचे शाळेतील आई-बाबाच आहेत. त्यांच्या कडुन ज्ञान मिळवुन उत्तीर्र्ण होणेे किंवा बोट धरुन परिक्षा पार करणे हे विद्यार्थ्यावर अवलंबुन आहे.
ज्ञाना करता अभ्यास हे ध्येय निश्चित केले तर मार्ग थोडा लांबचा आहे, कष्टाचाही आहे. परंतु, निश्चित फलदाई एवढेच नव्हे तर चिरकाल फळ देणारा आहे. वाचन, मनन, चिंतन व लेखन या चार पायऱ्या. कांही वेळा पायरी चढुन गेल्यावर पुन्हा खालच्या पायरीवर सुद्धा यावे लागते. असे नेहमीच घडेल असे नाही. सुरवातीला वारंवारिता जास्त असेल. सवय झाली, एकाग्रता आत्मसात केली की असे प्रसंग तुरळक होत जातील.

No comments:

Popular Posts